चंदगड ते कोल्हापूर पर्यंत सुरू असणारे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे. या कामाचा ठेका तिलारी गारगोटी हायवेज प्रा.ली. कंपनीकडे आहे. सदरचा राज्यमार्ग हा कुर पासून कोल्हापूर पर्यंत भुदरगड बांधकाम विभाग च्या अखत्यारीत येतो आहे. हा रस्ता आता बऱ्यापैकी पूर्ण झालेला दिसतो. पण हळदी येथे वादात अडकलेला रस्ता, मोऱ्या बांधलेल्या ठिकाणी अस्मांतर रस्ता, मोऱ्यांवरून साठलेलं पाणी अशांमुळे वाहतुकीसाठी अजूनही जिकिरीचा आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप होत आहे.आता तर हळदी येथील अपुऱ्या रत्यावरून प्रवास करणे अतिशय धोकादायक झाले आहे. रस्ता काम पूर्ण होण्याची मुदत केंव्हाच उलटली आहे.
आता फक्त आठ दहा टक्केच काम अपूर्ण आहे. बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता हळदी येथील अपुरा रस्ता हा संबंधित ठिकाणच्या नागरिकाडील विरोधामुळे न्यायप्रविष्ठ बाब असल्याने हा रस्ता अपुऱ्या अवस्थेत असल्याचे समजले. तरीदेखील संबंधित रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे प्रयत्न येत्या आठ-दहा दिवसात सुरू होतील अशी माहिती मिळाली. पण गेली चार वर्षे रखडलेले काम खड्डे बुजवण्यापेक्षा लवकरात लवकर पूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधीं आणि शासकीय अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून अतिक्रमण प्रश्र्नी नागरिक आणि रस्त्याशी संबंधित घटकांचा योग्य समन्वय साधत सदरचा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूकीस योग्य करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या रस्त्यावरून हजारो चाकरमानी एम आय डी सी आणि कोल्हापुर या ठिकाणी कामानिमित्त रोजचा प्रवास करतात. त्यांच्यात या कामाविषयी भलता संताप आहे. आता या प्रवाशांची सहनशक्ती संपल्यात जमा आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभाग, ठेकेदार कंपनी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देणे अतिशय गरजेचे बनले आहे. सध्या हा रस्ता इतका खराब अवस्थेत आहे की कधीही एखादा मोठा अपघात होऊ शकतो आणि अस झाल तर सदर घटनेस ठेकेदार ला जबाबदार धरायचं, बांधकाम विभागाला की लोकप्रतनिधींना असा प्रश्न वाहन धारकांमध्ये उमटतो आहे. दरम्यान पडलेले खड्डे बुजवने आणि मोऱ्यांवरील अडथळे दूर करून वाहन प्रवास सुखकर होण्यासाठी प्राधान्य देऊ असे सांगितले आहे.