कागल, प्रतिनिधी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या विस्तारीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यावेळी कागल शहरात प्रवेश करणारा शंभर वर्षापूर्वीचा अरुंद आसलेला रस्ता नव्याने करताना मोठा करावा,तसेच या ठिकाणी होणार उड्डाण पूल भरावा टाकून न करता तो कराडच्या धर्तीवर पिलर उभा करुन करावा. अशी मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली.यावेळी कागल शहरातील व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदनही मंत्री गडकरी यांना त्यांनी दिले. सर्व बाबींचा विचार करून यावर सकारात्मक तोडगा काढून,याबाबत तात्काळ निर्णय घेण्याबाबत संबधित विभागास नितीनजी गडकरी यांनी आदेश दिले. अशी माहिती घाटगे यांनी दिली.
कागल शहर व परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कागल शहरात रहदारीची मोठी समस्या आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात तयार होणारा उड्डाणपूल दुतर्फा भरावा टाकून न करता कराडच्या धर्तीवर पिलर उभे करून करावा. त्यामुळे रहदारीच्या समस्येवर कायमस्वरूपी मात होईल व व्यापा-यांचाही प्रश्न मिटेल. अशी मागणी निवेदनात केली आहे.
कागल शहरालगत असणारे विविध कारखाने, साखर कारखाने दूध संघ, फाईव्ह स्टार एमआयडीसी, शासकीय कार्यालये, एसटी स्टँड व कागल शहरातील वाढती रहदारी यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागतआहे. तो टाळण्यासाठी कागल शहरात प्रवेश करणारा नवीन मार्ग मोठा व प्रशस्त व्हावा व कराडच्या धर्तीवर कागलमध्ये उड्डाणपूल व्हावा, या मागणीसाठी कागलमधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह एन. एच. 4 ऑफिसमधील सर्व अधिकाऱ्यांसमवेत श्री.घाटगे यांनी नुकतीच एक बैठकही घेतली होती. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक श्री. पंदारकर व रोडवेज कन्स्ट्रक्शनचे प्रमुख अभियंता वैभव पाटील व व्यापारी व नागरिक यांचा समावेश होता. या बैठकीत व्यापारी, शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये या प्रश्ना बावत सविस्तर चर्चा झाली होती.या प्रश्नात श्री घाटगे यांनी पुढाकार घेऊन तो मार्गी लावावा, अशी विनंती या शिष्टमंडळाने केली होती. त्या अनुषंगाने घाटगे यांना हे निवेदन दिले.