प्रतिनिधी मिलिंद कांबळे
पिसाळलेल्या कोल्ह्याचा एका बालिकेसह सहा जणांवर हल्ला आवळी तालुका राधानगरी येथे पिसाळलेल्या कोल्ह्याने एका लहान बालकेसह सहा जणांचा चावा घेतला असून त्यांना जखमी केले आहे. जखमी नागरिकांना कोल्हापूर येथे सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शनिवारी सायंकाळी उसाच्या शेतातून कोल्ह्याने नागरी वस्तीत प्रवेश केला. प्रारंभी टिपूगडे वसाहतीतील बाबुराव तुकाराम टिपुगडे, संभाजी बाळू शिंदे, सुनील महिपती चौगले यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर खासदार माने दूध संस्थेच्या शेजारी असलेल्या कु. राजनंदनी शिवराज सरनाईक या तीन वर्षाच्या लहान बालिकेच्या मानेला चावा करून जबर जखमी केले. बालिकेला हल्ला करत असताना बळवंत लहू पाटील या नागरिकांने पाहिले व तिची सुटका करण्यासाठी गेलेल्या पाटील यांना देखील कोल्ह्याने चावा घेऊन पलायन केले. त्यानंतर शीला कृष्णा चौगले या महिलेवर त्याच कोल्ह्याने आज पहाटे हल्ला केला. हा कोल्हा पिसाळलेला असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले.हा कोल्हा भुकेलेल्या अवस्थेत असल्याने त्याने शाळींदर या वन्य प्राण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता शाळींदरने त्याच्या तोंडात व कानात पंख सोडल्याने हा कोल्हा जखमी होऊन कोसळला व वन विभागाच्या पथकाला सापडला. वनपाल विश्वास पाटील, वनरक्षक उत्तम भिसे, बळवंत डवर, उत्तम गुरव, जोतीराम कवडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत कोल्ह्याचे शवविच्छेदन व तपासणी करून पंचनामा केला.राधानगरी तालुक्यात वन्य प्राण्यांचे मानवावरील हल्ले वाढल्याने वन्यजीव आणि मानव हा संघर्ष दिसून येत आहे. त्यामुळे वन विभागांना वन्य प्राणी जंगलाबाहेर येऊ नयेत यासाठी वनांमध्ये अन्न, पाणी अशा तत्सम सुविधा निर्माण करण्याची मागणी जनतेतून होत आहे.