कागल शहर प्रतिनिधी, राजू कचरे
कागल : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना चिमुकल्यानी बांधलेल्या राखीमुळे ते भारावले. पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी बांधलेली राखी ही तृणधान्यांची होती. राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत कागलच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्यावतीने तृणधान्याच्या पोषण तत्वांचा हा अभिनव प्रसार आणि प्रसार करण्यात आला.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, भारतीय आहार पद्धतीमध्ये तृणधान्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तृणधान्यांमध्ये असलेल्या उच्च पोषण तत्त्वांमुळे बालपणापासूनच आहारात तृणधान्यांचा समावेश असावा.
राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत अभियानाचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प अधिकारी अमोल पाटील, सुपरवायझर सुमित्रा कोरवी, पिंपळगाव खुर्द सरपंच शितल नवाळे, अंगणवाडी सेविका अंजना आकुर्डे, संगीता पोवार, सुजाता मोरे, गीतांजली पाटील, समाजिक कार्यकर्ते अमोल नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी फराळ म्हणून पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील अंगणवाडी सेविकांनी तृणधान्यापासून बनवलेली चिक्की, लाडू, पापड असे अनेक पदार्थ आणले होते. मंत्री मुश्रीफ या फराळाचा मनमुराद आस्वाद घेतला.
जाहिरात