के के न्यूज प्रतिनिधी संग्राम पाटील
कोल्हापूर : कोल्हापूरातील ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याकडे आमदार जयश्री जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. शाहू मिलच्या जागेचा सर्वांगीण विकास करावा आणि कोल्हापूर शहराच्या विकासास चालना द्यावी अशी मागणी आमदार जाधव यांनी यावेळी केली.
शाहू मिल आराखड्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेऊन, एक वर्षात स्मारकाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले. त्यामुळे राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरद़ृष्टीचा हा अनमोल ठेवा जतन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, सर्व सामान्य जनतेचे व बहुजन समाजाला नवजीवन देणारे आणि देशाला समतेचा संदेश देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोल्हापुरातील जनतेचा स्वाभिमान.
रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह कोल्हापुरात कारखानदारीचा पाया शाहू महाराजांनी सन १९०६ ला ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अॅँड विव्हिंग मिल’ची उभारणी करून रचला परंतु, सद्यस्थितीत शाहू मिल बंद अवस्थेत आहे. शाहू मिल जागेचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.शाहू मिलची जागा वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. शाहू मिलचा सर्वांगीण विकास करताना, ही जागा कोल्हापूर महानगरपालिकेस हस्तांतरित करणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीच्या हस्तांतरणाची सद्यची वस्तुस्थिती काय आहे ? तसेच स्मारकासाठी निःशुल्क जमीन कोल्हापूर महानगरपालिकेला किती दिवसात देण्यात येणार ? शाहू मिलच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी सरकारने अनेकदा निधी देण्याची फक्त घोषणा केली पण प्रत्यक्षात कोणतीही मदत केलेली नाही. यामुळे शाहू मिल आराखड्याला शासन किती निधीची तरतूद करणार ? व सदर आराखडा किती दिवसात पूर्ण करणार ? तसेच शाहू मिल आराखड्यास विलंबाची कारणे कोणती असून, यास जबाबदार असणाऱ्यांच्या किंवा हलगर्जीपना करणाऱ्या स्थानिक प्रशासनावर कारवाई करणार का ? असे प्रश्न आमदार जाधव यांनी उपस्थित केले.
राज्यात सरकारे येतात- जातात, सत्ताबदल व पक्षबदल करून अनेकदा सरकारे पाडलेही जातात त्याबरोबर प्रशासन ही बदलते. मात्र गट -तट विसरून कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियोजित शाहू स्मारकाचा विकास आराखडा साकारण्यासाठी, छत्रपती शाहू महाराजांचे विचार स्मारकाच्या माध्यमातून जिंवत ठेवण्यासाठी, कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शाहू मिल मध्ये उभारणे गरजेचे आहे. यामुळे छत्रपति शाहू महाराज यांच्या यथोचित स्मारकासाठी शाहू मिल विकास आराखड्यातील सर्व अडथळे दूर करून, शासनाने तातडीने निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार जाधव यांनी केली.आमदार जाधव यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिलेले आहे की कोणत्याही परिस्थितीत हे स्मारक केले जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. हे सरकार शाहू महाराजांचा वारसा घेऊन चालत आहे, त्यामुळे शाहू स्मारकाला जाणीवपूर्वक दिरंगाई करणेचा भाग अजिबात नाही. शाहू मिलची जमीन वस्त्र उद्योग विभागाच्या ताब्यात आहे. या शाहू मिलच्या 167 कोटीच्या आराखड्यास 2013 मध्ये मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे वस्त्र उद्योग विभागाची जमीन ताब्यात घेणे व काम सुरू करणे हे महत्त्वाचे आहे. सरकार स्मारक पूर्ण करणार हे निश्चित आहे आणि यासाठी वस्त्र उद्योग विभागाची जमीन पैसे घेऊन द्यायची की पैसे न घेऊन द्यायची हा सरकारचा प्रश्न आहे आणि याबाबतचा तातडीचा निर्णय सरकार नक्की करेल व येत्या वर्षभरात स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल.