मलकापूर प्रतिनिधी:
लेखक जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो यातूनच त्या लेखकाचे स्थान साहित्यविश्वात निश्चित होत असते. तरुणवर्ग ललित वाङ्मयाकडे कसा पाहतो, त्यावर कसा विचार करतो, हे दिनेश काळे यांचे कथात्मक साहित्य या ग्रंथातून स्पष्ट होते. समकाळात चांगल्या लेखकावर लिहिले जात नाही. तरुण पिढीतील संशोधक दिनेश काळे यांच्या साहित्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात , त्यांचा परिचय कसा करून देतात याचा एक चांगला पट या ग्रंथातून पुढे यतो असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांनी व्यक्त केले. ते महावीर महाविद्यालयात डॉ. बाळासाहेब सुतार आणि डॉ. प्रियदर्शनी देशमुख लिखित ‘दिनेश काळे यांचे कथनात्मक साहित्य’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. एका लेखकाचा अभ्यास या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. सोबतच समीक्षाही संक्षिप्त असली पाहिजे.
युरोपमध्ये अनेक ज्ञानशाखांची सरमिसळ होत असताना मराठीतील समीक्षा विश्व मात्र संकुचित होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर नव्या विचाराची समीक्षा या ग्रंथात दिसते” असेही डॉ. शिंदे आपल्या भाषणात म्हणालेकार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समीक्षणात्मक किंवा संपादित वाचन केल्याशिवाय माणूस समृद्ध होत नाही असे सांगून या ग्रंथातून दिनेश काळे यांच्या वैविध्यपूर्ण लेखनातील सामर्थस्थळे दाखवून दिली आहेत. इंग्रजी साहित्यामध्ये शेक्सपियरने ज्याप्रमाणे ३६ ग्रंथांची निर्मिती केली त्याचप्रमाणे दिनेश काळे यांनी सुद्धा ३६ ग्रंथ निर्मिती करून मराठी साहित्य विश्वामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे . नव्या लिहित्या हातांना सोबत घेऊन या संपादित ग्रंथाची निर्मिती उत्कृष्ट झाली आहे. असेही डॉ लोखंडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. गोपाळ गावडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी करून दिला. आभार डॉ. शरद गायकवाड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. रमेश खबाले यांनी केले . कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.