आज हा व्हिडिओ मला एकाने पाठवला आणि चला कुणीतरी यावर बोललं याच बरं वाटलं. मलकापूर ग्रामिण रुग्णालयाचा कार्यभार सांभाळत असताना उद्गीरी, शित्तुरतर्फवारुण, विशाळगड, अनुस्कुरा असे खुप लांबून लांबून रुग्ण येत असत. तो भाग बऱ्यापैकी डोंगर, दऱ्याखोऱ्या, गर्द झाडी यांचा आहे. आमचा मोठा दवाखाना सोडला तर जिथे डिलीव्हरी आॅपरेशन वगैरे होईल असा दुसरा मोठा दवाखानाच दुरवर कुठे आसपास नाही. नाहीतर मग रत्नागिरी किंवा सरकारी कोल्हापूर ला जाव लागतं. रात्रीच्या वेळी एखादी गरोदर स्त्री असेल तर तीला दवाखान्यापर्यंत आणणं खुप जोखमीच काम असायचं. त्या आडमार्गाच्या गावंमध्ये वाटेत वाघ, गवा येण्याचीही भिती. कित्येकदा मी रुग्ण तपासत असताना न कळत नातेवाईकांच बोलणं माझ्या कानावर पडायचं. काहीजण स्वतः सांगायचे त्यांच्या गावात आजही चारचाकी वाहन सरळ जाण्याची सोय नाही. एकीकडे देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असताना आजही कित्येक गावांमधे अशी भयावह स्थिती आहे.
एकदा मी माझ्या काही मित्रांसोबत सहज तिकडचा भाग फिरत असताना रस्ता चुकलो होतो आणि एका घनदाट जंगलात आमची गाडी गेली. आम्हाला कांदवन डॅम बघायचा होता पण आम्ही वेगळ्या रस्त्याने बरेच पुढे आलेलो. साधारण पावसाळ्याचे दिवस असल्यानं ते जंगल इतक घनदाट झालं होतं की सुर्यप्रकाशही जमिनीवर येत न्हवता. खाली मुरुम दगडाचा रस्ता आणि दोन्ही बाजुंनी गर्द झाडी. मोबाईला रेंज नाही. बऱ्याच काळानंतर समोरुन एक गाडी आली. त्यांना आम्ही कांदवन ला हाच रस्ता का विचारल असता त्यांनी नाही हा उद्गीरी गावाचा रस्ता आहे, असच जंगलातून अजून बरंच पुढे आहे अस सांगितलं. तसंच आताच एक मोठ्ठा गवा पलिकडे गेला आहे तुमच काही काम नसेल इथुनच मागे फिरा असं सांगितलं. मग आम्ही तसच मागे फिरलो. पण ते जंगल माझ्या चांगल लक्षात आहे.
दुचाकीवाले तर सायंकाळ नंतर त्या रस्त्याने जातच नसावेत. बस वडाप असला प्रकार तर दिसलाच नाही. नंतर एकदा मी हाॅस्पिटल मध्ये काम करत असताना केएबिनमधल्या सिसिटीव्ही मध्ये बघीतलं तर एक कुटुंब बराच वेळ गेटवर थांबले होते. त्यांना तपासून उपचार तर झालेत पण का थांबले असावेत असा प्रश्न पडला. वेळ रात्रीचे १० एक वाजले असतील. मी सिक्युरिटीला त्यांना आत बोलवायला सांगितलं, साधारण २०-२१ वर्षाचा तरुण त्याची बायको आणि आई तिघेजण होते. का थांबलाय विचारलं असता ते म्हंटले घरी जाण्यासाठी काय मिळतं का बघतोय. गाव उद्गीरी. माझ्या पटकन ते जंगलातली सफर लक्षात आली मी म्हंटलं आता कुठलं वहाण मिळणार तुम्हाला? त्यावर ते नाही असेल मिळेल काहीतरी बघतो. त्यावर मी त्यांना म्हंटल तुम्ही थांबा दवाखान्यात उद्या सकाळी जा. खरतर त्यांना वहान मिळणे शक्य नव्हते पण दवाखान्यात आपल्याला विनाकारण थांबू देणार नाहीत या भितीने त्यांनी दवाखान्याबाहेर गेटवरच मुक्काम करायच ठरवलं असावं. मी रहा म्हंटल्यावर त्यांना बरं वाटलं. नंतर अशा कित्येक लोकांना मी उपचार झाल्यानंतर रात्र असेल तर घरी जायची व्यवस्थित सोय आहे का? असेल तरच जा नाहीतर रात्रभर दवाखाण्यात आराम करुन सकाळी जा अस संगायचो. सध्याच्या बुलेट ट्रेन आणि डबल फ्लायोव्हर च्या काळात अशा भागातील लोकांना हक्काचा रस्ता, लाईट, दळणवळणाच्या गोष्टी तरी मिळाव्यात हीच अपेक्षा
डॉ .विशाल सकटे
वैद्यकीय अधिकारी मलकापूर